सहसा कुणा बद्दल लिहिणं आणि त्यातून चांगलं काही तर लिहिणं हे जरा दुर्मिळच होत चाललं आहे. एखाद्याचं कौतुक करणं हे अगदी पहिल्यांदा स्वतःच्या फायद्या साठी किंवा स्वार्था साठी असावं असं वाटूनही जातं. म्हणूनच ज्याच्या साठी लिहितोय त्यानां न दाखवता सार्वजनिक करणारच नाहीय. किंवा सार्वजनिक केलं नाही तरी चालण्या सारखं आहे. कारण भावना आणि तीही ज्यांना आपण नेहमी आदर्श मानतो त्यांच्या बद्दलची असेल तर ती मना पासून आलेली आहे. आणि ती फक्त उत्कट आहे , तेव्हा तिला दुसरं काही नको असतं.
मला नेहमीच नेतृत्व करायची आवड आणि सवड दोन्ही होती. मी नेहमीच माझ्या आजूबाजूच्या उत्तम नेतृत्वाना शोधायचो, जवळून निरीक्षण करायचो, वाचायचो आणि त्यातून शिकायचो. कदाचित मला हे व्यसनच लागलं, अर्थातच हे चांगलं व्यसन होत, आहे. मग मी शाळेत शिक्षकांना बघितलं, शाळेच्या अध्यक्षांना बघितलं , काही पोलीस अधिकार्यांना बघितलं, संघ शाखेतील अनेक स्वयंसेवक, पदाधिकारी, मित्र ह्यांना सुद्धा जवळून पाहिलं. सार्वजनिक गणेश मंडळ, राजकीय पदाधिकारी कित्येक ठिकाणी मला एखाद्या लोकांच्या समूहाला सोबत घेऊन जाणारे अनेक नेते दिसले आणि मी त्यांच्या कडून शिकलो.
राजा शिवछत्रपती ह्या पुस्तकात तर प्रत्येक पानावर मला एक एक असामान्य नेतृत्व क्षमतेची पात्र आणि व्यक्ती रेखा भेटल्या. गुरुचित्र्याच्या पारायणा प्रमाणे मी शिवचरित्राची परायणी केली. नंतर मग संभाजी महाराज, बाळाजी विश्वनाथ, श्रीमंत बाजीराव, महादेवराव सिंधिया , नाना फडणवीस, राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, स्वातंत्रवीर सावरकर , डॉ. आंबेडकर, भागतसिह, सुभाष चन्द्र बोस, डॉ. हेडगेवार, श्यामा प्रसाद मुखर्जी, प.पु.गोळवलकर गुरुजी अश्या अनेक नायकांना वाचलं अभ्यासलं आणि जगण्याचा, निर्णय प्रक्रियेचा भाग बनवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे , शरद पवार, प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, ह्यांना ऐकता बघता आलं. आणि समजलं कि वक्तृत्वा शिवाय नेतृत्व शून्य असते. मोठं होत असताना एका परिसाचा स्पर्श झाला त्याच नाव संभाजीराव भिडे गुरुजी आणि मग उमजलं कि वक्तृत्वा सोबत नेतृत्वामध्ये चारित्र्य पूर्ण असं कर्तृत्व पाहिजे आणि असलं पाहिजे एक वादळं. नशिबानं मोदी, योगी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस बघता येतायत.
काम सुरु केलं आणि भेटले आमचे गुरुदेव हणमंतराव गायकवाड. रतन टाटा, आनंद महिंद्रा, धीरूभाई, नारायण मूर्ती सगळ्यांना वाचलं. वेड्या सारखं त्यांचा अभ्यास केला. पुढं कित्येक प्राचार्य बरच काही शिकवून गेले आणि अजूनही शिकवतायत आणि मी शिकतोय.
अश्यातच माझ्या सारख्या एकलव्याला, साधारणतः सात- आठ वर्षा पूर्वी एक द्रोणाचार्य दिसले. कुणी तरी बोलण्या मध्ये असा उल्लेख केला कि पी.सी.सी.ओ इ चे ट्रेनिंग प्लेसमेंट हेड प्रा. रवंदळे हे एक मोठं आणि नावाजलेलं प्रस्थ आहे. साहजिकच एक उत्सुकता निर्माण झाली. त्यातच २०१५ मध्ये बंगलोर येथे एक कॉन्फरन्स होती तिथे मी सरांना पहिला बघितलं. बोलायसाठी जवळ तर गेलो पण धाडस झालं नाही. फक्त बघत होतो पण वाटलं नाही कि जाऊन बोलावं. दिसायला तसे छोटेसे, तब्येत एकदम सडसडीत, चालणं बऱ्यापैकी फास्ट आणि चेहऱ्यावर एक खूप पॉसिटीव्ह अशी स्माईल असं काहीसं पहिलं दर्शन मला करायला मिळतं होत. अधून मधून डाव्या हातानं केस एकसारखे करण्याची त्यांची लगबग स्वभावातला नीटनेटका अधोरेखित करत होती. समोरच्या माणसाला ऐकताना मान थोडीशी कललेली, डोळे अगदी नकळत बारीक झालेले आणि प्रतिक्रिया म्हणून परत मिळणार ते स्मितहास्य अगदी मोहित करणार होतं.
पुढे मग महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स ह्या एका संघट्नेची स्थापना झाली हे फक्त आम्हाला समजलं आणि त्याचे अध्यक्ष सर झाल्या ची कळालं. २०१७-१८ ला सी.ओ.ई.पी मध्ये एक कार्यक्रम होता तेव्हा आम्ही गेलेलो तिथे सर मला पुन्हा दिसले. २०-२५ टीपीओ आणि त्यांच्या मध्यभागी अगदी सगळ्यात पुढे सर उभे होते. औपचारिक कार्यक्रम संपत आल्यावर प्रश्नोत्तर सुरु झाली आणि मग सरांनी ताबा घेतला. एकेक प्रश्न म्हणजे अगदी बाणा सारखा व्यासपीठा कडे जायचा आणि मग समाधन कारक उत्तर मिळतं कि नाही ह्यासाठी ते वाट बघत असायचे. उत्तर पटलं तर ठीक नाही तर पुन्हा अतिशय विनम्रतेनं पुढील प्रश्न करायचे. एक स्वछ पांढरा कुडता त्याच्या बाह्या कोपरापर्यंत दुमडलेल्या , काळी जीन्स, चकाकणारे शूज, आणि पुन्हा ते डाव्या हाताने केस सावरत उजव्या हाताने माईक सांभाळणं सगळं अगदी एखाद्या लढवय्या नेत्याला साजेसं असं. मग पुढं त्यांनी तिथे असलेल्या काही पदाधिकार्यांना एक निवेदनं हि दिलं. त्यादिवशी त्यांना भेटलो खरं पण मी फारसा बोललो नाही. आणि त्यांची आणि माझी अजून एक भेट अर्धवट राहून गेली.
२०१९ मध्ये आम्ही आमच्या अँप चा लाँच करायचा होता. आम्ही त्यांना निमंत्रण दिलं, त्यांनी ते स्वीकारलं आणि मी तयारीला लागलो. अगदी आदल्या दिवशी सकाळी त्यांच्याशी बोलणं झालं आणि आता मी वाट बघू लागलो कि सर आपल्याला जवळून भेटतील, गप्पा मारता येतील, चर्चा करता येईल, शिकता येईल पण दुपारी सरांचा फोन आला कि एक मेडिकल इमरजेंसी आहे. माझा पार्टनर त्यांना आणण्यासाठी पुण्यात पोहोचला सुद्धा होता. पण त्यांची अडचण जास्त गंभीर होती. त्यांना रात्री निघावं लागणार होतं आणि वेळ तसा कमी होता. गुरुदत्त न आमच्या ड्रायव्हर काकांना विंनती केली कि तुम्ही सरांना घेऊन त्याच्या गावी जावा. ते तयार झाले पण सर ऐकेनात. शेवटी बराच वेळ आग्रह आणि विंनती केल्यावर सर तयार झाले. गुरुदत्त सांगली कडे निघाला आणि सर त्यांच्या गावी. साधारणतः रात्री ची १२ ची वेळ असावी. इतक्या टेन्शन मध्ये ह्या माणसानं आम्हाला आमच्या कार्यक्रमासाठी एक व्हॉइस मेसेज सेंड केला. मला तेव्हा प्रश्न पडला कि , “कसं जमत असेल ह्यांना इतकं प्रसंगावधान राखणं ?
आणि आता पुढील किस्सा नीट वाचा.
इकडे आमचा कार्यक्रम झाला आणि ड्रायव्हर काका दुसऱ्या दिवशी मला भेटले. ते माझ्या जवळ आले आणि बसले. मला म्हणाले, “सर मला वाईट वाटलं!( त्यांच्या डोळ्यात नक्कीच पाणी आलेलं होतं )”
मला काहीच समजेना, ” तिकडं काही वाईट घडलं का ?”, मी विचारलं.
“नाही, तसं काही नाही. आम्ही सकाळी तिथं पोहोचलो. सगळं वातावरण थोडं जडच होत. मी आवरलं आणि निघालो. आणि इतका मोठा माणूस , माझ्या पाय पडू लागला. मी मग सरकलो तर मला मिठी मारून, हॅन्ड शेक करून मला थॅन्क्यु म्हणू लागला. इतकी वर्ष लोकांच्या गाड्या चालवल्या, लोकांना अडीअडचणीला घेऊन गेलो कुणी असं वागलं नाही ओ माझ्या सोबत.” ( काकांचे डोळे भरलेले होते ). पुढले काही क्षण मी फक्त शांत होतो. ना मला काही सुचलं ना समजलं.
त्या दिवशी मला नेतृत्व कॊशल्याचा सगळ्यात मोठा धडा मिळाला होता, कृतज्ञता हा सगळ्यात मोठा गुण आहे जो प्रत्येक नेत्या कडे असलाच पाहिजे आणि मुळातच तो पदं , मोठेपणा किंवा अश्या अनेक भौतिक गोष्टीचा मोहताज नसतो. ती असते एका निर्मळ, पवित्र आणि मोठ्या मनाच्या व्यक्ती ने दुसऱ्या (कदाचित पहिल्या पेक्षा गुणाने, कर्माने लहान) व्यक्तीला दिलेली दाद ! माणसातलं माणूस पण नेहमी जिंवत ठेवण्यातच एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाचं महान असणं अधोरेखित होतं.
ह्यांनंतर कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात हि सरांनी काकांची आवर्जून भेट घेतली. नेमका त्या नन्तर काही दिवसातच लोकडाऊन झाला आणि सगळंच बंद पडलं. ह्या लोकडाऊन मध्ये आम्ही एक ऑनलाईन टेस्ट घेतली आणि ती करत असताना आम्ही थोडंसं कमीही पडलो. चूक दाखवून देण्याची सरांची शैली भावली. आम्हाला दुखावलं हि नाही पण आम चे डोळे उघडले. पुढं सगळं उत्तम झालं पण सरांबद्दल चा आदर किती तर पट मोठा झाला.
परवा फेब्रुवारी मध्ये मी स्वतः सरांना भेटायला गेलो. ती माझी आणि सरांची पहिली भेट. मला दिलेल्या वेळी मी गेलो बाहेर काही मुले होती. त्यांनी आमची ओळख विचारली आणि आमचं कार्ड आत जाऊन दिलं. ती मुलं बाहेर आली आणि त्यांनी आम्हाला पाणी देऊन वाट बघायला सांगिलती. पाच मिनटं हि झाली नसतील आणि सर बाहेर आले. मला वाटलं त्यांचं काही तरी काम असेल, बाहेर येऊन आम्हला भेटले, कुणाला तरी आम्हाला चहा द्यायला सांगितला. आणि मला म्हणाले एक १० मिनिटं एक महत्वाचं काम चालू आहे. वास्तविक आम्हाला जाणीव होती कि ते किती व्यस्त असतात. तेव्हा १०-१५ मिनिटं लागतील हे अपेक्षितच होतं पण जे काही मी अनुभवतं होतो ते अचंबित करणार होत. साधारणतः पुढील १५ मिनिटामध्ये आम्हाला आत बोलावलं गेलं, खुर्चीतून उठून आमचं स्वागत करणं, हॅन्ड शेक करणं किंवा आम्हाला बसवून मग खुर्चीत बसणं हे सगळंच मुळात विलोभनीय होतं. ते बळजबरी नव्हतं, अनैसर्गिक नव्हतं किंवा दिखावा हि नव्हता. ते अगदी सहज आणि त्यांच्या सवयीचं होतं. प्रत्येकाशी वागण्याची ती त्यांची पद्धत आहे, हे सहज जाणवत होतं. एक क्रिम कलरचा शर्ट पुन्हा तो कोपऱ्यापर्यंत दुमडलेला त्याची इस्त्री एक टक्का सुद्धा गेली नव्हती. तीच स्माईल, भुवयांची विशिष्ट लयी मध्ये होणारी हालचाल आणि त्यातून मग कपाळावर येणाऱ्या आठ्या. एका बाजूला मान कललेली आणि प्रचंड अश्या कॉन्सट्रेशन माझं बोलणं ऐकणं. लिस्टनिंग स्किल्स त्यापेक्षा प्रोऍक्टिव लिस्टनिंग स्किल्स च ते सर्वोत्तम उदाहरण होत. जे पटलंय त्यात दिल खुलासा होकार, जे पटलं नाही त्यात मध्येच अडवून खोचक प्रश्न. जे ऐकायला नवीन आहे असं वाटलं त्यात कुतूहल आणि शेवटी पुढील वाटचालीसाठी भरभरून आशीर्वाद. बाहेर पडताना पुन्हा उभाराहून सी ऑफ !
ह्या व्यक्तिमत्तवाचे असे कित्येक पैलू असतील जे आपल्याला अजून कळायचेत इतकं मनाला पटवून मी आनंदानं आणि समाधानानं बाहेर पडलो.
मग परवाच्या कार्यक्रमाचा मेल आला, फोन झाला. अगदी वेळच्या वेळी नेटनेटका संवाद, त्यात स्पष्टता, औपचारिकता आणि तितकीच विनम्रता. कसं जमतंय काय माहीत? मग लोगो द्या म्हणून स्वतः फोनं. निमंत्रणाचा स्वतः केलेला मेसेज. कार्यक्रमा आवर्जून चौकशी आणि फक्त माझी नव्हे तिथे आलेल्या सगळ्यांची. साधरणतः चारशे माणसं त्या दिवशी आलेली. माझ्यासारखे व्हेंडर , इतर टीपीओ, आणि कित्येक एच.आर. सगळे फक्त एका धाग्यानं गुंफलेले होते, डॉ. शितलकुमार रवंदळे.
स्वागत समारंभात उत्तम भाषण, काही गोष्टी चुकतायत माहित असूनही संयम, सतेज वर बसून सगळी यंत्रणा व्यवस्थित सांभाळण. कुठंही राग, त्रागा ह्याचा लवलेश सुद्धा नाही. प्रमुख अतिथी जास्त वेळ बोल्ट आहेत आणि कुणाचं त्यांना हे सांगायचं धाडस होईना म्हण्टल्यावर स्वतः हळूच कानात जाऊन सांगणं. दिवसभर सगळ्या पॅनल ना ऐकणं. संध्याकाळी आपले सहकारी त्यांचे विचार मांडत असताना ते हि ऐकणं आणि त्यांना प्रोत्साहित करणं, स्टेज वर पुशउप चॅलेंज स्वीकारून सगळ्यांत जास्त पुशअप्स मारणं आणि सगळ्यात शेवटी सगळ्या बरोबर प्रचंड नाचणं. सगळे जण दमले पण सर नाही. “अरे दिवानो, मुझे पेहचानो !,” ह्या गाण्यावर नाचताना मला असं वाटून गेलं कि ह्याच्या साठीच हे गाणं लिहिलं असेल. मी स्तब्ध उभा होतो त्यांच्या कडे बघत आणि गाण्याचे बोल वाजत होते “डॉन……. डॉन……. !”